Wednesday, 24 June 2020

आरोग्यम धनसंपदा



*कारले*
_सहजसुंदर सर्वत्र उपलब्ध होणारे अमृतफळ …._



“कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच! ” अशी ओळख असणा-या कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. ग्रीष्मात आढळणाऱ्या भाज्यांमध्ये कारले एक आहे. कारल्याची वेल बरीच वर्षे जगणारी असते ती ब-याच ठिकाणी आपोआप उगवलेली सुद्धा दिसते. चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले भारतात सर्वत्र पिकते व अती प्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. संस्कृतमध्ये कंदुरा (करवल्ली), हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये कॅरीला फ्रुट किंवा बिटर गार्ड म्हणून ओळखले जाणारे कारले ही वनस्पती कुकरबिटेसी या कुळातील आहे.

कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दोन प्रकार सबंध भारतात आढळतात.

कारले सर्व सामान्य आहारामध्ये वापरले जात असले तरी ते एक उत्तम औषध म्हणून वैद्य पाहतात.

हल्ली बाजारात मिळणारी हायब्रीड आणि मोठी कारली शक्यतो आहारात वापरू नयेत.

भरपूर रेषा असणारी आणि मध्यम आकाराची कारली वापरावीत.

औषधी गुणधर्म :
आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक, वातानुलोमक, कृमिघ्न व मूत्रल आहेत. कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ‘ब’ जीवनसत्त्व थोडय़ा प्रमाणात असते. या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तीवर्धक, पुष्ठीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.

कारल्याचे औषधी उपयोग आपण पाहूया …

१) कारले रक्त आणि लघवी मधली साखर कमी करते. वजन वाढलेले आहे आणि मधुमेह आहे अशा लोकांनी आहारात कारले नियमित ठेवावे. कारल्याचा थेट रस कपभर किंवा ग्लासभर घेउ नये. घेतलाच तर जास्तीत जास्त चार ते सहा चमचे एवढाच घ्यावा. तोही कपभर पाण्यात मिसळून घ्यावा.

२) चरबी वाढल्यामुळे होणारे आजार आणि विषबाधा यावर नियमित कारले सेवन करणे हे फार मोठे आणि साधे औषध आहे.

३) अंगाला पिसू सारखे कीटक चावल्याने अंगाची आग होत असेल तर कारल्याच्या पानांचा रस अंगास चोळावा.

४) तोंडाला चव नसेल, भूक लागत नसेल, पचन होत नसेल तर कारल्याची भाजी नियमित खावी.

५) कारले उत्तम रक्तशुद्धी करते त्यामुळे त्वचारोग असणा-या लोकांसाठी ती एक नवसंजीवनी आहे.

६) पाळीच्या विकारात कारले उत्तम असून वेळेवर पाळी येत नसेल किंवा पाळी अचानक बंद झाली असेल तर कारल्याचे नियमित सेवन करावे.

७) रातआंधळे पण असेल तर डोळ्यावर पानांचा लेप लावतात.

८) अंगावर सूज असेल तर कारल्याचा रस सकाळी घेतल्यास फायदेशीर आहे.

९) दमा, सर्दी, खोकला अशा श्वसन मार्गाच्या तक्रारी असतील तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे विकार दूर होतात.

१०) जंत-कृमी झाले असतील तर कारल्यांच्या पानांचा रस कपभर नियमितपणे आठ दिवस द्यावा. यामुळे सर्व कृमी शौचावाटे पडून जातात.

११) आम्लपित्ताचा त्रास होत असेल कारले नियमित सेवन करावे.

१२) कारल्यांच्या पानांचा ३ चमचे रस एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. या सोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीशी होतात.

१३) खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर लिंबूरस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.

१४) मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्यांचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ, संध्याकाळ ५-५ ग्रॅम (अर्धा चमचा) नियमितपणे घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते.

१५) दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते. ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्यांच्या पानांच्या रस रोज सकाळ-संध्याकाळ कपभर घ्यावा.

१६) कावीळ या विकारांमध्ये ताज्या कारल्यांचा रस सकाळ-संध्याकाळ प्यावा यामुळे कावीळ दूर होते.

१७) यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो.

१८) कारल्याच्या पानांचा कल्क, हळद, तीळ तेलात उकळून हे तेल त्वचेला लावल्यास जुने त्वचा विकार तसेच सोरायासीस हा विकार दूर होतो.

१९) स्त्रियांमध्ये बीजांडकोषाला सूज आल्यास कारले बी, मेथी, गुळवेल, जांभूळ बी यांचे चूर्ण करून प्रत्येकी पाच ग्रॅम (अर्धा चमचा) सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
२०) लघवीस त्रास होत असेल तर कारल्यांच्या पानांचा १ कपभर रस चिमूटभर हिंग घालून प्यावा.

२१) जुनाट ताप (जीर्णज्वर) झालेला असेल तर अशा वेळी कारल्याची पाने वाटून त्याचा रस काढावा व हा रस सकाळी व संध्याकाळी पिण्यास द्यावा.

२२) रातआंधळेपणाचा त्रास होत असेल, तसेच डोळ्यांना क्षीणता आली असेल तर रोज कोवळ्या कारल्यांचा रस किंवा चूर्ण सकाळी संध्याकाळी १-१ चमचा घ्यावे.

त्यात फॉस्फऱस भरपूर असते. कारल्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. आहारात त्याचा अंतर्भाव केल्यास जेवण व्यवस्थित पचते. शिवाय भूकही चांगली लागते.

दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर आहे. पोटात गॅस वा अपचन झाल्यास कारल्याचा रस घ्यावा. पक्षाघात झालेल्या रूग्णांना कच्चे कारले फायदेशीर ठरते.

उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात थोडे पाणी मिसळून, त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे. लगेचच फरक पडतो. यकृताच्या रोगांसाठी कारले रामबाण औषध आहे. जलोदर झाल्यास किंवा यकृत वाढल्यास अर्ध्या कप पाण्यात दोन मोठे चमचे कारल्याचा रस मिसळावा व रोज बरे होईपर्यंत तीन चार वेळा सेवन करावे.

कारले रक्तशुद्धीही करते. मधुमेहाच्या रूग्णांना एक चतुर्थांश कप कारल्याच्या रसात तेवढाच गाजराचा रस मिळवून प्यायला द्यावे. गाठ आल्यास किंवा हातापायांची आग होत असल्यास कारल्याच्या तेलाने मॉलिश करावे. असे हे कारले बहुगुणी आहे.

कारल्याच्या सेवनामुळे मुतखडे फुटून ते मुत्राच्या मार्गाने बाहेर पडू शकतात. कारल्यात क्विनाईन असल्याने मलेरियावर ते आहार्य द्रव्य म्हणून वापरण्यात येते.

सावधानता :
कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात पिणे शक्य होत नाही अशा वेळी खडीसाखर अथवा मध घालून प्यावा. परंतु मधुमेही रुग्णांनी खडीसाखर व मधाचा वापर करू नये.

कडू कारल्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे कारले आवडत जरी नसले तरी काही प्रमाणात त्याचा आहारात समावेश करा.

आंतरजालावरुन साभार
🌷 आरोग्यम् धनसंपदा  🌷

Saturday, 13 June 2020

आजची संस्कार कथा

🙏संस्कार कथा🙏_
                 
➖➖➖➖➖➖➖➖➖
गोपू आजोबांचा लाडका होता. स्वभावाने तो खोडकर पण, तितकाच गुणवान होता. अभ्यास तसेच खेळांमध्येही तो सर्वाच्या आघाडीवर असायचा. पण, अचानक त्याला काय झाले कुणास ठाऊक. त्याचे वागणे जरा विचित्र होत चालले होते. तो वाईट मित्रांच्या संगतीत राहू लागला. कधी न कुणाविरुद्ध अपशब्द काढणारा तो गोपू वर्गात दुस-यांच्या टिंगल टवाळक्या करू लागला. विनाकारण कुणाच्याही खोडय़ा काढण्यात त्याला खूप मजा येत असे.

अभ्यासात होत असलेलं दुर्लक्ष आणि त्याच्या या बदललेल्या अनपेक्षित वर्तणुकीमुळे त्याचे आई-वडील अधिकच चिंतीत होत होते. त्यांनी गोपूला घरी येऊन आपल्यापरीने खूप समजाविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. एके दिवशी गोपूच्या आजोबांना एक युक्ती सुचली. त्यांनी तडक बाजारातून काही आंबे, एक टोपली आणि एक सडका आंबा विकत घरी आणला आणि गोपूला म्हणाले, ‘‘गोप्या, या आंब्यांना टोपलीत व्यवस्थित भर. आणि त्यात हा सडलेला आंबाही ठेव. परवा ते आपल्याला खायचे आहेत.’’

आजोबांनी सांगितल्याप्रमाणे गोपूने अगदी तसेच केले. तिस-या दिवशी आजोबा गोपूला म्हणाले, ‘‘गोपू, चल ती आंब्यांनी भरलेली टोपली घेऊन ये.’’ त्यांच्या या वक्तव्यावर गोपू ती टोपली लगेच दिवाणखान्यात घेऊन आला. त्याने ती टोपली उघडून बघितली आणि आश्चर्याने आजोबांना म्हणाला, ‘‘आजोबा, हे काय? आतमधले सगळे आंबे त्या एका सडक्या आंब्यामुळे खराब झाले आहेत.’’

आजोबा लगेच उत्तरले, ‘‘अगदी बरोबर गोप्या, बघितलंस हा संगतीचा वाईट परिणाम. एका सडक्या आंब्याच्या सान्निध्यामुळे इतरही आंबे नासके निघाले. आपल्या जीवनातही आपल्यासोबत नेमकं असंच होत असतं. वाईट प्रवृत्तींचा जर आपल्याला सहवास लाभला तर आपणही नकळतपणे त्या प्रवृत्तींना बळी पडतो. आपण खोटेपणाने वागायला लागतो. या सवयींमुळे आपली माणसं आपल्यापासून दुरावतात. शेवटी तू ही तुझ्या त्या वाईट मित्रांच्या आहारी गेलास आणि पूर्वीचा सर्वाना हवाहवासा तुझा स्वभाव गमावून बसलास.’’

आजोबांचे हे बोलणे ऐकून गोपू निरुत्तर झाला आणि त्याने त्याच्या त्या चुकीची आजोबांकडे मोठय़ा मनाने क्षमा मागितली आणि यापुढे पूर्वीसारखा प्रामाणिकपणे वागेन असे आश्वासन दिले.

वाईट संगतीचा परिणाम हा शेवटी वाईटच असतो. वाईट प्रवृत्तींच्या व्यक्तींपासून नेहमी दूर राहणेच चांगले असते !

*➖➖➖➖➖➖➖➖
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

Thursday, 11 June 2020

आजची बोधकथा



  ═════ ♢.✰.♢ ═════   
               बाजीगर
  ═════ ♢.✰.♢ ═════

*🌹बालमित्रांसाठी खास सुट्टीतील मेजवाणी🌹*       

        एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता.तो एक उत्कृष्ट नेमबाज होता.चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमध्ये ही प्रिय होता. 
        एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या महाविद्यालयातील गणेश नावाचा एक विद्यार्थी प्राचार्यांना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,"सर! मी संजयपेक्षाही जास्त अचूकतेने नेम साधू शकतो. संजयला पराजित करणे हे माझे उद्दिष्ट आहे." प्राचार्य मंदसे हसले आणि पुढे गेले, कारण त्यांना माहित होते कि संजयला हरवणे इतके सोपे काम नाही. स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एका धाग्याला एक लाकडी फळ बांधले होते, त्याचा वेध नेमबाजांनी घ्यायचा होता.
       सर्व नेमबाजांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना यश मिळाले नाही. फक्त गणेश आणि संजय हे दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले. गणेशने यावेळी पुढाकार घेतला. त्याने पहिला नेम साधला तो अचूकपणे, दुसरा नेम त्याचा हुकला आणि तिसराही नेम योग्य पद्धतीने साधला. आता संजयची वेळ होती. संजय नेमबाजीला उभारला कि मुलांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. संजयने पहिला नेम मारला तो चुकला, दुसरा मारला तोही चुकला आणि तिसराही नेम त्याला मारता आला नाही. संजय पराजित झाला. सारी मुले, शिक्षक हिरमुसले झाले. संजय प्रथमच पराजित झाला होता. प्राचार्यांना व शिक्षकांना संजय हरला यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याला एकटे बोलावून घेतले. अनेकांनी त्याला विचारले पण तो काही सांगायला तयार होईना. शेवटी प्राचार्यांनी त्याच्यावर दबाव टाकला तेंव्हा त्याने सांगितले,
        "सर ! गणेशला मी बाहेर त्याच्या मित्रांबरोबर बोलताना ऐकले कि त्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे या पुरस्काराच्या रकमेतून त्याची फी तो भरणार आहे. मी या गोष्टीची अनेक मित्रांकडून खात्री केली. सर माझ्या हरण्याने जर कुणाचे आयुष्याचे कल्याण होत असेल तर मी कायम हरायला तयार आहे. सर माफ करा यामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला पण त्यातून एका विद्यार्थ्याचे आयुष्य उभारेल याचे मला समाधान आहे.
           " या त्याच्या बोलण्याने सर्वच उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या व प्राचार्यांनी संजयचे एक विशेष गुणवान विद्यार्थी म्हणून अभिनंदन केले. 
● *तात्पर्य - आपल्या सदवर्तन करण्याने कुणाचे ना कुणाचे चांगले कसे करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.*
                                *संग्रहित*
━━━━━━━━❪❐❫━━━━━━━━
             
━━━━━━━━❪❐❫━━━━━━━━